खूप वर्षांनी भेटलोय,आहे संध्याकाळ मोकळी
निवांत बोलत बसलोय, होतायत मनं मोकळी
बाहेर आभाळ दाटलेलं, पाऊस कोसळतोय
आपलं कुठे चुकलं, हा प्रश्न आत छळतोय
तुझी गोष्ट ऐकताना मी वरकरणी हसतोय
मुक्त तुझ्या हास्याचा सूर कुठेतरी बोचतोय
एकाच शर्यतीचे घोडे कधी होतो आपण दोघे
जिंकलास तू, गेलास पुढे- आम्ही निव्वळ बघे..
कसं सांगू माझ्या आत काय ठसठसतंय,
भरलेली खपली पुन्हा निघणारसं दिसतंय
तुझं सारं आखीव रेखीव,सगळं कसं जिथलं तिथे..
माझं रटाळ,ठरीव- आहे जेमतेम..जिथलं तिथे !
सुख-दु:खांच्या गोष्टी? आठवतोय दु:खंच सगळी
आज पुन्हा जाणवतंय- मित्रा,तुझी गोष्टच वेगळी…
31 07 2008 at 10:40 am |
सुंदर काव्य वाचून बरं वाटलं.